बदलापूर घटनेचा कराडमध्ये नोंदवला तीव्र निषेध
तहसील कार्यालयावर महाविकास आघाडीचा मोर्चा; सरकारविरुद्ध घोषणाबाजी, प्रशासनास निवेदन सादर

कराड/प्रतिनिधी : –
‘योजना नको संरक्षण द्या, बदलापूर घटनेतील नराधमांना फाशी झालीच पाहिजे, राज्य सरकारचा धिक्कार असो’ अशाप्रकारे तीव्र घोषणाबाजी करत महाविकास आघाडीच्या माध्यमातून येथील तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. तसेच तहसीलदार कल्पना ढवळे यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
शनिवार, दि. 24 शहरातील दत्त चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केल्यांनतर दत्त चौक ते तहसील कार्यालयापर्यत हातात निषेदाचा फलक झळकवत व राज्य सरकारविरुद्ध तीव्र घोषणाबाजी करत मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे सरचिटणीस उदयसिंह पाटील-उंडाळकर, कराड दक्षिण कॉंग्रेस कमिटीची अध्यक्ष मनोगर शिंदे, महाराष्ट्र युवक प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष शिवराज मोरे, मलकापूरच्या माजी उपनगराध्यक्षा नीलम येडगे, माजी जिल्हा परिषद सदस्य निवास थोरात, शिवसेनेचे (उबाठा) नितीन काशीद, विद्याताई थोरवडे, प्रा. धनाजी काटकर, तसेच कॉंग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार पक्ष), शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महाविकास आघाडीतील अन्य घटक पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, तसेच महिलांची उपस्थित होती. त्यानंतर तहसील कार्यालयाच्या ठिकाणी निदर्शने केल्यानंतर तहसीलदार कल्पना ढवळे यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
याप्रसंगी माध्यमांशी बोलताना उदयसिंह पाटील-उंडाळकर म्हणाले, बदलापूर अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ लोकभावना शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी महाविकास आघाडीच्या माध्यमातून हा निषेध मोर्चा काढण्यात आला आहे. आज शासनाच्या माध्यमातून राज्यातील सुरक्षितता धोक्यात आली असून असुरक्षित महिला, भगिनी भीतीच्या छायेखाली वावरत आहेत. यासाठी शासनाला जाग आणण्याच्या दृष्टीने हा मोर्चा काढण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
मनोहर शिंदे यांनी तहसीलदार कल्पना ढवळे यांना महिला भगिनींनी दिलेले निवेदन शासनापर्यत पोहचवून बदलापूर घटनेतील पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याची विनंती केली.