प्रशासनास निवेदन देवून बदलापूर घटनेचा नोंदवणार निषेध – मनोहर शिंदे
न्यायालयाचे आदेश आणि वरिष्ठांच्या आवाहनानंतर आजचा महाराष्ट्र बंद मागे घेत असल्याची दिली माहिती

कराड/प्रतिनिधी : –
बदलापूर घटनेच्या निषेधार्थ आज शनिवारी 24 ऑगस्ट रोजी महाविकास आघाडीतर्फे महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. परंतु, न्यायालयाच्या आदेशांनंतर महाविकास आघाडीतील वरिष्ठ नेत्यांनी सदरचा बंद मागे घेण्याचे आवाहन केल्याने हा बंद तूर्तास मागे घेण्यात येत आहे. परंतु, आज शनिवारी सकाळी दत्त चौकात एकत्र जमून प्रशासनास निवेदन देवून सरकारचा निषेध नोंदवण्यात येणार असल्याची माहिती मविआतर्फे कराड दक्षिण काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोहर शिंदे यांनी दिली.
येथील शासकीय विश्रामगृहात महाविकास आघाडीच्या माध्यमातून पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, उच्च न्यायालयाने सदरच्या बंदला विरोध केल्याने त्यानंतर महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांनी शनिवारचा नियोजित बंद मागे घेण्याचे आवाहन केल्याने हा बंद मागे घेण्यात येत असल्याची माहिती मनोहर शिंदे यांनी दिली आहे.
पत्रकार परिषदेस नंदकुमार बटाने, शिवराज मोरे, अशोक पाटील, माजी नगरसेवक गंगाधर जाधव, नितीन काशीद, झाकीर पठाण, प्रा. धनाजी काटकर, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला जिल्हाध्यक्षा अनिता जाधव आदींची उपस्थिती होती.
नंदकुमार बटाने म्हणाले, आज शनिवार, दि. 24 रोजी येथील दत्त चौकात सकाळी 10 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून जमलेल्या पदाधिकारी, नागरिकांच्या वतीने एकत्रितपणे प्रशासकीय कार्यालयात प्रांताधिकारी व तहसीलदारांना याबाबतचे निवेदन देण्यात येणार असून राज्य सरकारचा निषेध नोंदवण्यात येणार आहे.
शिवराज मोरे यांनी बदलापूर घटनेनंतर पोलिसांकडून तक्रार घ्यायला दिरंगाई केली. नागरिकांनी उत्स्फुर्तपणे रेल्वे रोको करून तीव्र निषेध व्यक्त केला. परंतु, यामध्ये राजकारण होत असल्याचा आरोप करून बाहेरून लोक बोलावून आंदोलन केल्याचा आरोपही करण्यात आला. मात्र, मुख्यमंत्र्यांनी या घटनेबाबत केलेले वक्तव्य त्यांना शोभत नसून त्यांनी राज्यातील महिलांची माफी मागावी, अशी मागणीही केली.
धनाजी काटकर यांनी बदलापूर घटनेतील संबंधित नराधमांना फाशी झालीच पाहिजे, यासाठी फास्टट्रॅक न्यायालयात सदर केस चालवण्यात यावी, अशी मागणी धनाजी काटकर यांनी केली.
अनिता जाधव यांनी बदलापूर व कोल्हापूर सारख्या घटनांना राज्य व केंद्र सरकार जबाबदार आहे. त्यामुळे राज्य सरकारने अशा घटनांमधून धडा घेत महिलांच्या संरक्षणाची जबाबदारी घ्यावी, अशी मागणी केली.