महाराष्ट्र बंद सर्वांनी मिळून यशस्वी करूया
मनोहर शिंदे यांचे महाविकास आघाडीतर्फे आवाहन; केंद्र व राज्य सरकारचा नोंदवणार निषेध

कराड/प्रतिनिधी : –
आपण शाहू, फुले, आंबेडकर आणि छत्रपती शिवरायांचा वारसा सांगतो. त्याकाळी महिलांना सन्मानाची वागणूक होती. परंतु, सध्याच्या महायुती सरकारच्या काळात भोंगळ कारभार सुरू असून महिला, मुलींवरील अत्याचाराचा घटनांमध्ये वाढ झाली आहे. बदलापूर येथे झालेली घटना अत्यंत अमानुष असून या घटनेच्या निषेधार्थ देण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदमध्ये नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन सर्वांनी मिळून हा बंद यशस्वी करूया, असे आवाहन महाविकास आघाडीतर्फे कराड दक्षिण काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोहर शिंदे यांनी केले.
येथील शासकीय विश्रामगृहात महाविकास आघाडीच्या माध्यमातून पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी नंदकुमार बटाने, शिवराज मोरे, अशोक पाटील, माजी नगरसेवक गंगाधर जाधव, नितीन काशीद, झाकीर पठाण, प्रा. धनाजी काटकर, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला जिल्हाध्यक्षा अनिता जाधव आदींची उपस्थिती होती.
श्री. शिंदे म्हणाले, न्यायालयाने जरी बंद करण्याबाबत मनाई केली असली, तरीही जनतेने उत्स्फूर्तपणे या बंदमध्ये सहभागी व्हावे. यासाठी कोणावरही बंधन करण्यात येणार नाही. तसेच अत्यावश्यक सेवांना यामधून वगळण्यात आले आहे. सध्या सणासुदीचे दिवस असल्याने केवळ दुपारपर्यंत सदरचा बंद लागू राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
नंदकुमार बटाने म्हणाले, बदलापूरनंतर कोल्हापूरमध्येही अशा प्रकारची घटना घडल्याची माहिती आहे. अशा घटना घडत असतानाही शासन मूग गिळून गप्प आहे. सरकारला या घटनांचे गाभीर्य लक्षात आणून देण्यासाठी सदरचा बंद पुकाण्यात आला आहे. आज शनिवार, दि. 24 रोजी येथील दत्त चौकात सकाळी 10 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून महामोर्चास सुरुवात करण्यात येणार आहे. त्यानंतर प्रशासकीय कार्यालयात प्रांताधिकारी व तहसीलदारांना याबाबतचे निवेदन देण्यात येणार असून त्यानंतर महामोर्चाचे रूपांतर सभेत होणार आहे. याठिकाणी अनेक मान्यवर आपले मनोगत व्यक्त करणार आहेत. या महामोर्चात शहरातील नागरिक, व्यापारी, विविध संस्था, संघटनांनीही उस्पर्तपणे सहभाग व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.
अनिता जाधव म्हणाल्या, बदलापूर व कोल्हापूर सारख्या घटनांना राज्य व केंद्र सरकार जबाबदार आहे. या घटनांच्या पार्श्वभूमीवर आम्ही स्थानिक पातळीवर नागरिकांशी चर्चा केली. यावेळी मुलींना शाळेत पाठवण्यास पालकांमध्ये प्रचंड भीती निर्माण झाली असल्याचे दिसून आले. यामुळे सर्वांनी एकत्र येऊन सदर बंदमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे. राज्य सरकारने अशा घटनांमधून धडा घ्यावा. तसेच राज्य सरकारने महिलांच्या संरक्षणाची जबाबदारी घ्यावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
यावेळी शिवराज मोरे यांनी सदर घटनेनंतर मुख्यमंत्र्यांनी केलेले वक्तव्य त्यांना शोभत नसून त्यांनी राज्यातील महिलांची माफी मागावी, अशी मागणी केली.
प्रा. धनाजी काटकर यांनी कोणत्याही प्रकारच्या राजकारणासाठी हा बंद पुकारण्यात आला नसल्याचे सांगत संबंधित नराधमांना फाशी झालीच पाहिजे, यासाठी फास्टट्रॅक न्यायालयात सदर केस चालवण्यात यावी, अशी मागणी केली.