‘लाडकी बहीण’ योजनेच्या मुदतीची अट काढून टाका – आ. पृथ्वीराज चव्हाण
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली पत्राद्वारे मागणी

कराड/प्रतिनिधी : –
शासनाची ‘मुख्यमंत्री लाडकी बहिण’ योजनेचा सर्व्हर वारंवार बंद असल्याने योजनेमध्ये नोंदणीला विलंब होत असून काही ठिकाणी नोंदणीच होत नसल्याचे प्रकार निदर्शनास येत आहेत. सहा-सहा तास ओटीपी येत नसल्याने लाभार्थ्यांना दिवस-दिवसभर आधार केंद्रात ताटकळत बसावे लागत आहे. त्यामुळे अंतिम तारखेपर्यंत नावनोंदणी होऊ शकणार नाही, ही चिंता निर्माण झाली आहे. यासाठी सदर योजनेच्या मुदतीची अट काढून टाकावी. जेणेकरून राज्यातील सर्व पात्र महिलांना या योजनेचा लाभ घेता येईल, अशी मागणी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केली आहे. तसेच याबाबतचे ट्विटही आ. चव्हाण यांनी केले आहे.
राज्याच्या पावसाळी अधिवेशनात शासनाने या योजनेची घोषणा केली, तेव्हा या योजनेची मुदत 15 जुलै होती. त्याबाबत आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी अधिवेशनात योजना नोंदणीची अंतिम तारीख काढून टाकावी, अशी मागणी केली होती. तसेच या योजनेचा लाभ राज्यातील 60 वर्षांवरील जेष्ठ महिलांना सुद्धा मिळावा, यासाठी वयोमर्यादेची अट सुद्धा काढली जावी, अशीही मागणी केली होती. त्यानुसार राज्य सरकारने 31 ऑगस्टपर्यंत मुदत वाढवली. तसेच कमाल वयोमार्यादा 60 वर्षांहून 65 वर्षे केली. परंतु, अजूनही लाडकी बहीण योजनेत सहभागी होण्यासाठी महिला वर्गाच्या मोठ्या रांगा आहेत. सॉफ्टवेअरचा वाढता तांत्रिक बिघाड पाहता 31 ऑगस्ट ही लाडकी बहिण योजनेची मुदत काढून ही योजना ‘सामाजिक सुरक्षा हक्क’ या स्वरुपाची करुन राज्यातील सर्व पात्र बहिणींना कधीही लाभ मिळवता येईल, असा बदल करण्याबाबतची आग्रही मागणी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्र्याकडे केली आहे.