सातारा जिल्हाहोम

कराड दक्षिणेमधील विकासकामांसाठी दोन कोटींचा निधी

डॉ. अतुल भोसले यांच्या प्रयत्नांतून यश; ग्रामीण विकास कार्यक्रमाच्या 25-15 योजनेंतर्गत मंजुरी

कराड/प्रतिनिधी : –

कराड दक्षिण मतदारसंघातील विविध गावांमधील विकासकामांसाठी राज्यशासनाच्या ग्रामविकास व पंचायत राज विभागाच्या माध्यमातून दोन कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. भारतीय जनता पक्षाचे  प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुल भोसले यांच्या विशेष प्रयत्नातून हा निधी मंजूर झाला असून, याबाबतचा शासन आदेश नुकताच राज्य शासनाच्या ग्रामविकास व पंचायत राज विभागाच्यावतीने प्रसिद्ध करण्यात आला आहे.

कराड दक्षिण मतदारसंघातील विविध गावांमधील विकासकामांसाठी निधी मिळावा, यासाठी डॉ. अतुल भोसले सातत्याने शासनस्तरावर पाठपुरावा करत आहेत. याबाबत शासनस्तरावर त्यांच्यामार्फत दाखल झालेल्या प्रस्तावांची आणि मागण्यांची दखल घेत, ग्रामविकास व पंचायतराज मंत्री ना. गिरीश महाजन यांनी ग्रामीण विकास कार्यक्रमाच्या 25-15 योजनेंतर्गत एकूण दोन कोटी रूपयांचा निधी मंजूर केला आहे.

या निधीच्या माध्यमातून रेठरे बुद्रुक येथील श्री विठ्ठल मंदिरास सभामंडप बांधणे (25 लाख), कुसूर येथे श्री बिरोबा मंदिरास सभामंडप बांधणे (15 लाख), बामणवाडी येथे बंदिस्त गटर करणे (10 लाख), येणपे – शेवाळवाडी येथे अंतर्गत रस्ते काँक्रीटीकरण करणे (10 लाख), गोळेश्वर येथे श्री लक्ष्मी मंदिराचे सभामंडप बांधणे (10 लाख), येरवळे येथे आर.सी.सी. गटर करणे (10 लाख), कोळे येथे अंतर्गत रस्ते सुधारणा करणे (10 लाख), कोळेवाडी येथे आर.सी.सी. बंदिस्त गटर करणे (10 लाख), बांदेकरवाडी येथे नवीन स्मशानभूमी बांधणे (10 लाख), घोगाव येथे स्मशानभूमी वॉल कम्पाऊंड करणे (10 लाख), म्हासोली येथे अंतर्गत रस्ते सुधारणा करणे (10 लाख), गोंदी येथे अंतर्गत रस्ते सुधारणा करणे (10 लाख), वहागाव येथे श्री महादेव मंदिर सभामंडप बांधणे (10 लाख), डिचोली पुनर्वसिन (धोंडेवाडी) येथे अंतर्गत रस्ते सुधारणा करणे (10 लाख), मनव येथे स्मशानभूमी शेड व दाहिनी उभारणे (10 लाख), टाळगाव येथे स्मशानभूमी दुरुस्ती व पाणी पुरवठा सुविधा करणे (10 लाख), घोणशी येथे स्मशानभूमी सुधारणा करणे (10 लाख), वारुंजी येथे स्मशानभूमी सुधारणा करणे (10 लाख) असा एकूण दोन कोटींच्या विकासकामांचा समावेश आहे.

सदरच्या विकासकामांना लवकरच प्रारंभ करण्यात येणार असल्याने, कराड दक्षिण मतदारसंघातील ग्रामीण भागाच्या विकासाला चालना मिळणार आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांतून मंत्री ना. गिरीश महाजन आणि डॉ. अतुल भोसले यांच्यासह महायुती सरकारचे आभार मानण्यात येत आहेत.

Related Articles