कराड तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा
शेतकऱ्यांची मागणी; शेतीमित्र अशोकराव थोरात यांच्या नेतृत्वाखाली प्रांताधिकारी व तहसीलदारांना निवेदन सादर
कराड/प्रतिनिधी : –
संतधार पावसाने खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले असून कराड तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी शेतीमित्र अशोकराव थोरात यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील शेतकऱ्यांनी प्रांताधिकारी व तहसीलदार यांच्याकडे नुकतीच निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी कृषिभूषण शंकरराव खोत, कृषिभूषण सुधीर चिवटे, प्रगतशील शेतकरी रवींद्र पाटील, दत्तात्रय लावंड, तुळशीराम शिर्के, बाबासाहेब साळुंखे, अनिल वाघमारे, अनिल शिर्के, शेखर शिर्के, पंडित शिर्के यांच्यासह तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते.
अशोकराव थोरात म्हणाले, कराड तालुक्यामध्ये गेले तीन आठवडे सरासरीच्या 210 टक्क्यांपर्यंत पाऊस झाला आहे. त्यामुळे तालुक्यातील खरिपातील सोयाबीन, भुईमूग, कडधान्ये, भाजीपाला, फळभाज्या इत्यादी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अतिपावसाने जमिनीची धूप झाली असून मोठ्या प्रमाणात जमिनीतील अन्नद्रव्ये वाहून गेली आहेत. शेतीचे पाणंद रस्ते खराब झाले असून दळणवळणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांचे शेतीमालाचे फार मोठे नुकसान झाले आहे. हवामान अंदाजाप्रमाणे ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात 106 टक्के पाऊस होणार आहे. या सर्व बाबींचा विचार करून कराड तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा तसेच शेतजमीन व पिकांच्या नुकसानीची मोजदाद व्हावी व शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक मदत मिळणे गरजेचे आहे.