सातारा जिल्हाहोम

अर्थसंकल्पातील विकसित भारताच्या नवरत्नांच्या माध्यमातून देशाचा सर्वांगीण विकास शक्य – प्रा. डॉ. एम. एस. सुर्यवंशी

शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालयात ‘केंद्रीय अर्थसंकल्प २०२४-२०२५’ विषयावर परिसंवाद उत्साहात

कराड/प्रतिनिधी –

भारत देशाच्या अर्थसंकल्पातील कृषी क्षेत्राचा विकास, मनुष्यबळ विकास आणि सामाजिक न्याय, उत्पादन आणि सेवा, संशोधन आणि विकास, उर्जा सुरक्षा, शहरी विकास, अल्पवयीन शिक्षणासाठी वात्सल्य योजना, नव्या पिढीची सुधारणा, पायाभूत सुविधा व ग्रामीण भागाचा विकास इत्यादी अर्थसंकल्पातील नवरत्नांच्या माध्यमातून देशाचा सर्वांगीण विकास होणे शक्य आहे, असे प्रतिपादन शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. एम. एस. सुर्यवंशी यांनी केले.

येथील शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालयात अर्थशास्र विभागाच्या  वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘केंद्रीय अर्थसंकल्प २०२४-२०२५’ या विषयावरील परिसंवाद कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर माजी सिनेट सदस्य व महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. सतीश घाटगे होते.

प्रा. डॉ. सुर्यवंशी म्हणाले, देशामध्ये युवकांची संख्या जास्त असल्याने या युवकांचा पर्याप्त वापर केला, तर निश्चितच देशाचा आर्थिक समतोल साधला जाईल.

सदर परिसंवादात सहभागी झालेले साधन  व्यक्ती प्रा. ए. एस. जगताप यांनी अर्थसंकल्पना, अर्थसंकल्पाचे प्रकार, त्याचबरोबर रुपया कसा येतो आणि रुपया कसा जातो. याबाबत मार्गदर्शन केले. प्रा. डॉ. एस. जे. लाटवडे यांनी ‘नवीन कररचना’ या विषयावर मार्गदर्शन करताना मागील आणि चालू वर्षातील कररचना यांमध्ये असलेली तफावती संदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले.

प्रा. जे. एस. चव्हाण ‘अर्थसंकल्प-२०२४-२५ आणि कृषी क्षेत्रासाठीची नाविन्यपूर्ण तरतूद’  या विषयावर मार्गदर्शन करताना म्हणाले, देशात नैसर्गिक शेतीवर भर दिला पाहिजे. तसेच कृषी क्षेत्रातील विविध योजना राबवून कृषी क्षेत्राचा विकास केला, तर देशाच्या आर्थिक विकासात भर पडेल.

प्राचार्य प्रो. डॉ. सतीश घाटगे म्हणाले, अर्थसंकल्पाकडे डोळेझाक न करता डोळसपणे बघणं आवश्यक आहे. तसेच देशाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी शिक्षण क्षेत्रावर योग्य आणि जास्तीत जास्त खर्च होणे अपेक्षित आहे.

याप्रसंगी विद्यार्थी व प्राध्यापक यांनी परिसंवादामध्ये सहभागी होवून अर्थसंकल्पातील विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अर्थशास्त्र विभागाचे प्रा. डॉ. एम. एस. सुर्यवंशी यांनी, सूत्रसंचालन प्रा. दिपाली वाघमारे यांनी, प्रा. जे. एस. चव्हाण यांनी आभार मानले. कार्यक्रमास वरिष्ठ व कनिष्ठ विभागाचे सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थीनी बहुसंख्येने उपस्थित होते.

Related Articles