जिल्हाधिकारी कार्यालयावर मंगळवारी धडक मोर्चा काढणार – अशोकराव थोरात
शिक्षण व्यवस्थेवरील अनास्थेकडे वेधणार शासनाचे लक्ष; पाटणला मेळावा उत्साहात, मोर्चात सह्बागी होण्याचे आवाहन

कराड/वार्ताहर –
राज्यातील सर्वच राज्यकर्त्यांचे शिक्षणाविषयी नकारात्मक वातावरण तयार झाले आहे. शिक्षण व्यवस्थेवरील अनास्थेकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मंगळवार, दि. 6 ऑगस्ट रोजी सातारा येथे राजवाडापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात जिल्ह्यातील शैक्षणिक संस्थांचे संस्थाचालक, पदाधिकारी, विविध शैक्षणिक संघटना व मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना सहभागी होणार असून समाजातील सर्वच घटकांनीही मोर्चात उत्स्फूर्तपणे सामील व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था सघांचे उपाध्यक्ष अशोकराव थोरात यांनी व्यक्त केले.
पाटण येथील कोयना एज्युकेशन सोसायटीच्या डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम सभागृहात रविवारी आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी शिक्षण संस्था सघांचे सचिव एस. टी. सुकरे, शिक्षकेत्तर संघाचे भरत जगताप, संस्था संघटनेचे के. पी. पाटील, कोयना एज्युकेशन सोसायटीचे जनरल सेक्रेटरी अमरसिंह पाटणकर, सदस्य संजीव चव्हाण, पृथ्वीराज पाटील, दादासो जाधव आदींची प्रमुख उपस्थिती होती.
अशोकराव थोरात म्हणाले, प्राथमिक, माध्यमिक आणि महाविद्यालयीन शिक्षणाविषयीच्या राज्य शासनाच्या उदासीन धोरणाविरोधात विद्यार्थी, समाज, पालक जागृत नाही. पालकांना त्यांच्या अधिकाऱ्यांची जाणीवच नसल्याने आम्ही सर्वांना सावध करतोय, पुढील धोके सांगतोय. आपण समाज घटक म्हणून वेळीच सावध झालो पाहीजे. यासाठी राज्यात एकाचवेळी प्रत्येक जिल्हयात मोर्चा काढून शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठीच सदर मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
कोयना एज्युकेशन सोसायटीचे अमरसिंह पाटणकर म्हणाले, शिक्षण हा आपला मूलभूत अधिकार आहे. तो कोणालाही हिरावून घेता येणार नाही. समाजातील प्रत्येक घटकाला शिक्षण मिळालेच पाहिजे, हे शासनाचे कर्तव्य आहे. शासनाला शिक्षण ही गरज का वाटत नाही? बहुजन समाजाला शिक्षणाच्या प्रवाहात आणले पाहिजे. शिक्षक व शिक्षकेतर भरती बंदी आहे. मग शिक्षणाची गुणवत्ता वाढवायची कशी? दऱ्या-खोऱ्यातील लोकांचे शिक्षण बंद करण्याचा शासनाचा डाव मोडून काढण्यासाठी आपण शिक्षणासारख्या संवेदनशील विषयावर एकत्रित आलो पाहिजे. शिक्षणाचा जागर करून शासनाच्या विरोधात पुढे आलो पाहिजे. यासाठी समाजातील सर्व घटकांनी या मोर्चात सहभागी व्हावे.
शिक्षकेत्तर संघाचे भरत जगताप म्हणाले, शाळांसमोर अनेक प्रश्न आहेत. ते शासन दरबारी मान्य झालेशिवाय शाळा व्यवस्थित चालणार नाहीत. शासन भरती बंदीचे चुकीचे निर्णय घेत आहे. याला लोकशाही मार्गाने आंदोलन करणे गरजेचे आहे
यावेळी संजय हिरवे, बाळासाहेब कदम, दीपकसिंह पाटणकर, फैयाज शेख यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास तालुक्यातील विविध शाळांचे संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर सेवक, पालक मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. विनायक राऊत, संजय इंगवले यांनी आभार मानले.