सातारा जिल्हाहोम

कराडच्या चारही पाणीपुरवठा योजना इंटरलिंक करण्याची गरज 

आ. पृथ्वीराज चव्हाण; 10-15 दिवसांत नवीन पुलावरून पाइपलाइन 

कराड/प्रतिनिधी : –

कराड शहराचा पाणीपुरवठा महामार्गाच्या चुकीच्या कामामुळे विस्कळीत झाला आहे. या अपघातामुळे मुख्य पाइपलाइन वाहून गेल्याचे  स्पष्ट आहे. परंतु, असे अपघात पुन्हा घडू नयेत. तसेच एखादी घटना घडल्यास  शहराला होत असलेला पाणी पुरवठा खंडित होऊ नये. यासाठी कोयना नदीवरील कराड, मलकापूर, वारुंजी व उंडाळे या योजनांचे इंटरलिंकिंग करणे गरजेचे असल्याचे मत माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी मांडले.

आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी पुन्हा एकदा कराडच्या पाणी प्रश्नाबाबत पालिकेच्या व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून कामाचा आढावा घेतला. तसेच या बैठकीनंतर जलशुद्धीकरण केंद्राला प्रत्यक्ष भेट देऊन तेथील कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी मुख्याधिकारी शंकर खंदारे, एमजीपीचे अधिकारी व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

आ. चव्हाण म्हणाले, महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी कराड नगरपालिकेसोबत समन्वयच ठेवला नसल्याने हा पाणीप्रश्न उदभवला आहे. जुन्या जॅकवेलची यंत्रणा चालू केल्यानंतर शहराला 40 टक्के पाणीपुरवठा सुरु झाला आहे. वारुंजी येथील जॅकवेल पुन्हा चालू करण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. पण, तो निर्णय होईपर्यंत कराड शहराला पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा करण्यासाठी नवीन पुलावरून पाइपलाइन आणली जाईल. हे काम जिल्हाधिकाऱ्यांच्या देखरेकीखाली पूर्ण होणार आहे. येत्या 10 ते 15 दिवसात शहराच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल. पालकमंत्री व जिल्हाधिकारी यासाठी प्रयत्नशील असून त्यांचेही सहकार्य मिळत आहे.

कराडची लोकसंख्या वाढत असल्यामुळे शहराला 100 टक्के पर्यायी व्यवस्था असणारी पाणीपुरवठा योजना सुरु करण्याची आवश्यकता आहे. तसेच वारुंजी येथील बंधाऱ्याची उंची वाढविण्याची गरज आहे. जेणेकरून टेंभू योजनेचे अडवलेल्या पाण्याची फुग मागे राहून अशुद्ध पाणी उचलले जाऊ नये, यासाठी वारुंजी येथील बंधाऱ्याची मागणी विधानसभेत केली होती. त्यावर उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा विषय मार्गी लावण्यासाठी स्वतंत्र बैठक  लावण्याचे आश्वासन दिले होते. ती योजना कार्यान्वित झाल्यास कराड शहराला शुद्ध व स्वच्छ पाणी मिळेल.

कोयना धरणातून थेट पाइपलाइन योजना

कराड नगरपालिका व एमजीपीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, कराड शहरासाठी कोयना धरणातून थेट पाइपलाइन योजना आणायला हवी. त्यामुळे फक्त कराड शहरालाच नव्हे; तर कोयना नदी काठच्या सर्व गावांना स्वच्छ पाणीपुरवठा करता येईलच. पण, त्यासोबतच गुरुत्वाकर्षणमुळे कमी खर्चात ही योजना राबविता येऊ शकेल. कोल्हापूरला अशीच योजना मी मुख्यमंत्री असताना मंजूर केली होती, ती आता पूर्ण झाली आहे. त्यामुळे हा प्रयोग कराडलाही राबवता येवू शकतो, अशी कल्पनाही त्यांनी त्यावेळी मांडली.

Related Articles