सातारा जिल्हाहोम

‘स्मिता’मुळे दिव्यांगांचे भाग्य उजळले

मूकबधिर मुला - मुलीच्या जुळवल्या रेशीमगाठी; सामाजिक बांधिलकीचे सर्व स्तरातून कौतुक

कराड/प्रतिनिधी : –

कोणतेही शारिरीक व्यंग नसलेल्या सामान्य मुला – मुलींच्या रेशीमगाठी जुळवताना नाकी नऊ येतात, ही सध्याची परिस्थिती आहे. यावरून दिव्यांग, मूकबधिर मुला – मुलींची लग्नं जुळवताना किती सायास करावे लागतात, याची प्रचिती येते. परंतु, ‘स्मिता’ने हे शिवधनुष्य उचलून मूकबधिर मुला – मुलीच्या रेशीमगाठी जुळवून त्यांचे शुभमंगल लावून दिल्याने उभयतांचे भाग्य उजळले आहे.

सध्या मुला – मुलींची लग्नं जुळवणे हे मोठे दिव्यच बनले आहे. बऱ्याचदा मंगलकार्यामध्ये इच्छूक वधू – वरांसह दोन्ही कुटुंबीयांकडील अपेक्षांचा आभाशी डोंगर आडवा येतो. यामध्ये परिस्थितीची जाण, वाढते वय, वाया जाणारी आयुष्यातील उमेदीची वर्ष आदिंकडे डोळेझाक करत नोकरी, पद, पैसा, प्रतिष्ठा, संपत्ती, दागदागिने, सुखवस्तू अशा दिवास्वप्नांमुळे अपेक्षांची यादी वाढत जाते. परिणामी, अनेक मुला – मुलींची लग्नं रखडतात. मग हातातून वेळ निघून गेल्यावर तोडजोड करणे हे ‘उशिरा सुचलेले शहाणपण’ असे म्हणण्याची वेळ येते.

अशात गरज असते ती, सामाजिक बांधिलकीतून दोन्ही कुटुंबीयांमध्ये समन्वय साधून मुला – मुलींची लग्नं जुळवून आणणाऱ्या सह्रदयी व्यक्तीची. याच जाणिवेतून पेशाने शिक्षक असलेल्या बजरंग कुंभार व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. कुंभार मॅडम यांनी नांदलापूर, ता. कराड येथे ‘स्मिता वधू – वर सुचक संस्था’ स्थापन केली. या संस्थेने नुकताच आपला रौप्य महोत्सव पूर्ण केला आहे. या काळात त्यांनी हजारो मुला – मुलींच्या रेशीमगाठी जुळवत त्यांचे शुभमंगल लावून दिले. आज या सर्वांचे सुखी संसार चालू आहेत. या कार्यामध्ये आपल्या संस्थेला केवळ व्यावसायिक स्वरूप न देता नेहमी सामाजिक बांधिलकीला प्राधान्य देणाऱ्या कुंभार दाम्पत्याप्रति अनेक जोडपी विविध माध्यमांतून कृतज्ञता व्यक्त करताना दिसतात.

याच सामाजिक बांधिलकीतून स्मिता वधू – वर सुचक संस्थेचे संचालक श्री बजरंग कुंभार (सर) यांनी नुकतेच 3 जून 2024 रोजी कराड तालुक्यातील वडोली निळेश्वर येथील चिरंजीव अमित रामराव पवार आणि पुणे येथील चि. सौ. का. गीता हेगडकर या मूकबधिर मला – मुलीच्या रेशीमगाठी जुळवून आणत त्यांचे लग्न लावून दिले आहे. शिक्षित सर्वसामान्य मुला – मुलींची लग्नं जुळवताना अवाजवी अपेक्षांव्यतिरिक्त फारसे अडथळे येत नाहीत. मात्र, दिव्यांग, मूकबधिर मुला – मुलींची लग्नं जुळवताना अपेक्षित वधू – वर शोधणे, उभयतांसह त्यांच्या कुटुंबीयांमध्ये समन्वय साधून विवाह लावून देणे, मोठे कठीण काम आहे. परंतु, आपल्या शिक्षकी पेशामुळे समाजाशी नाळ जोडलेले, सामाजिक बांधिलकीची जाणीव असलेले, आपल्या मितभाषी स्वभावामुळे सर्वांसाठी आदरणीय व्यक्तिमत्व बनलेले श्री बजरंग कुंभार (सर) यांनी स्मिता वधू – वर सुचक संस्थेच्या माध्यमातून जोपासलेल्या या सामाजिक बांधिलकीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

अपेक्षा बाळगताय… सावधान! 
प्रत्येक विवाहप्रसंगी मंगलाष्टकांमध्ये ‘शुभमंगल सावधान’चा वारंवार उच्चार केला जातो. यामागे मोठा मार्मिक अर्थ दडलेला आहे. परंतु, सध्या आपल्या मुला – मुलींचे कल्याण कशात आहे? याकडे लक्ष न देता केवळ पद, पैसा आणि प्रतिष्ठेच्या नावाखाली, तसेच न संपणाऱ्या अवाजवी अपेक्षांच्या ओझ्याखाली मुला – मुलींची स्वप्नं व त्याचं भावी आयुष्यही दाबून टाकणाऱ्या पालक आणि आई – वडिलांसह विवाह इच्छूक वधू – वरांनीही आता सावधान होण्याची वेळ आली आहे. त्यामुळे ‘आपणच आपलं आयुष्य मार्गी लावू शकतो’ या जाणिवेतून मार्गक्रमण करणे आवश्यक असल्याचे मत स्मिता वधू – वर सुचक संस्थेच्या संचालिका सौ. कुंभार (मॅडम) यांनी व्यक्त केले.

‘स्मिता वधू – वर सूचक’ संस्थेने नुकताच आपला रौप्य महोत्सव पूर्ण केला आहे. या कालावधीत सामाजिक बांधिलकीतून आम्ही हजारो मुला – मुलींचे विवाह लावून दिले. यात काही दिव्यांगांचाही समावेश आहे. आज हे सर्वजण आपापल्या संसारात सुखी आहेत. यापेक्षा दुसरे भाग्य आणि समाधान नाही. यापुढेही आम्ही हीच सामाजिक बांधिलकी जोपासणार आहोत.
– श्री बजरंग कुंभार
(संचालक, स्मिता वधू – वर सुचक संस्था, नांदलापूर)

Related Articles