कराडला उद्यापासून सकाळी एकवेळ पाणीपुरवठा
मुख्याधिकारी शंकर खंदारे यांची माहिती; जळालेला पंप दुरुस्त झाल्याने पाणीउपसा सुरु
कराड/प्रतिनिधी : –
गुरुवारी रात्री तात्पुरता दुरुस्त करण्यात आलेल्या जुन्या जॅकवेलमधील पंप जळाला होता. याबाबतची माहिती मुख्याधिकारी खंदारे यांनी आ. पृथ्वीराज चव्हाण यांना दिली होती. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना याबाबतची कल्पना देत नवीन पंपासाठी जिल्हा नियोजनमधून निधी देण्यास सांगितले होते. दरम्यान, सदरचा पंप दुरुस्त करण्यात आला असून पाणीउपसाही सुरू झाल्याने उद्या शनिवार, दि. 20 पासून नागरिकांना सकाळी एकवेळ पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी शंकर खंदारे यांनी दिली आहे.
कराड शहराचा पाणीप्रश्न दिवसेंदिवस किचकट होत चालला आहे. यामध्ये आधीच अनेक अडचणी असताना नव्याने आणखी अडचणी निर्माण होत आहेत. त्यावर तात्काळ तोडगा काढण्यासाठी सर्वच लोकप्रतिनिधी, तसेच नगरपालिका प्रशासनही कार्यतत्पर असल्याचे दिसून येत आहे.
नागरिकांची सध्या पाण्याची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. त्यासाठी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण, भाजपचे कार्यकारी सदस्य डॉ. अतुलबाबा भोसले, त्याचबरोबर अनेक सामाजिक कार्यकर्ते, संस्था, संघटना व वैयक्तिक पातळीवरही नागरिकांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे शहरावर ओढवलेले जलसंकट बऱ्याच अंशी कमी झाले असून नागरिकांना अपुरा का होईना, पण पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांनीकडूनही समाधान व्यक्त केले जात असल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, गुरुवारी रात्री अचानक जुन्या जॅकवेलमधील पाणी उपसा करणारा पंप जळाल्याने पाणीउपसा खंडित झाला होता. नव्याने उभ्या राहिलेल्या संकटाबाबत मुख्याधिकारी शंकर खंदारे यांनी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांना याबाबतची कल्पना दिली. त्यांनी तात्काळ जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधून त्यांना सदर ठिकाणी नवीन पंप बसवण्यासाठी जिल्हा नियोजन समितीमधून निधीची तरतूद करण्याची सूचना केली. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्याधिकारी खंदारे यांना सूचित केले. तसेच जुना पंप दुरुस्त करून तात्काळ पाणीपुरवठा सुरू करण्याच्या सूचना त्यांनी केल्या होत्या. त्यानुसार मुख्याधिकारी खंदारे यांनी पालिकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना सोबत घेत प्रयत्नांची पराकाष्टा करून जळालेला पंप दुरुस्त केला आहे. तसेच त्याद्वारे पाणी उपसाही सुरू करण्यात आले असून पंयःच्या टाकीमध्ये पुरेसा पाण्यासाठी झाल्यानंतर उद्या शनिवारपासून नागरिकांना शहरात सकाळी एकवेळचा पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी खंदारे यांनी सांगितले आहे.
Show quoted text