विलासकाकांनी विकासाचा पाया घातला – पृथ्वीराज चव्हाण
विलासकाका पाटील-उंडाळकर पुतळा अनावरण व कोयना बँक प्रशासकीय कार्यालयाचे उद्घाटन उत्साहात

कराड/प्रतिनिधी : –
विलासकाकांची जिल्हा बँक त्यांनी नावारूपाला आणून विकासाचा पाया घातला. मंत्रीपदाच्या काळात त्यांनी अनेक खंबीर व धाडसी निर्णय घेतले. काकांनी वडिलांची शिकवण आणि काँग्रेसची विचारधारा यामुळे ते कोणत्याही प्रलोभनांना बळी पडले नाहीत. त्यांनी ती विचारधारा शेवटपर्यंत जोपासली, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.
येथील कराड शेती उत्पन्न बाजार समितीच्या आवारात उभारण्यात आलेले कोयना सहकारी बँकेच्या प्रवेशद्वारावरील माजी मंत्री लोकनेते स्व. लोकनेते विलासकाका पाटील-उंडाळकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे आ. भाई जयंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच या बँकेच्या प्रशासकीय कार्यालयाचे उद्घाटन राज्याचे माजी महसूल मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते करण्यात आले. अशा संयुक्त कार्यक्रमप्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
यावेळी सिक्कीमचे माजी राज्यपाल, माजी खासदार श्रीनिवास पाटील, माजी खा. जयवंतराव आवळे, सांगलीचे खा. विशाल पाटील, माजी सहकार, कृषी राज्य मंत्री आ. विश्वजीत कदम, आ. संग्राम थोपटे, कोयना सहकारी बँकेचे अध्यक्ष अॅड. उदयसिंह पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
आ. चव्हाण म्हणाले, आज काकांच्या विचारांवर आम्ही सर्वजण काम करत आहोत. विलासकाकांनी सुरू केलेल्या सर्वच संस्था आज सुस्थितीत चालू असून काकांचे अपूर्ण काम उदयसिंह पाटील चांगल्या पद्धतीने पूर्णत्वास नेत असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.
आ. भाई पाटील म्हणाले, विलासकाकांनी सातारा जिल्हा बँक, तसेच राज्याच्या सहकारात दिलेली योगदान कधीही न विसरता येणारे आहे. सहकारातील त्यांच्या योगदानाचे एखादे पुस्तक जिल्हा बँकेने प्रकाशित करावे, अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली.
बाळासाहेब थोरात म्हणाले, डाव्या आणि गांधीवादी विचारसरणीमध्ये काकांचे नाव घ्यावे लागेल. त्यांच्याकडे काम करण्याचा सकारात्मक दृष्टिकोन होता. त्यातून त्यांनी जिल्हा बँकेत शिस्तीचे बंधन घातले. काकांनी जपलेल्या पुरोगामी आणि राज्यघटनेतील मूलभूत तत्वांचा विचार जपण्याचे काम उदयसिंह पाटील करत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
जयवंतराव आवळे म्हणाले, काकांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक संस्था, संघटना व फॅक्ट्रा उभारल्या. परंतु, यापेक्षा सर्वात महत्त्वाचे त्यांनी कार्यकर्ते निर्माण करण्याची फॅक्टरी निर्माण केली.
विश्वजीत कदम म्हणाले, काकांनी जिल्हा बँक, बाजार समिती, खरेदी-विक्री संघ, कोयना दूध संघ, पतसंस्था, कोयना बँक, रयत कारखाना आदींच्या माध्यमातून त्यांनी शेतकऱ्यांना सक्षम केले. सातारा जिल्हा बँक सर्वच बाबतीत अग्रगण्य असण्यामध्ये काकांचा मोठा वाटा आहे. काकांनी उभारलेल्या रयत कारखान्याचे नामकरण लोकनेते विलासकाका पाटील-उंडळकर रयत कारखाना करावे, अशी इच्छाही त्यांनी यावेळी उदयसिंह पाटील यांच्याकडे बोलून दाखवली.
श्रीमंत पाटील म्हणाले, काकांनी अतिशय प्रयत्नांतून सुरू केलेला साखर कारखाना दिमाखात सुरू रहावा, यासाठी काकांच्या प्रेमापोटी आम्ही हा कारखाना चालवायला घेतला. आज कारखाना कर्जमुक्त झाला असून तो उदयसिंह पाटील यांच्याकडे हस्तांतरित करणार आहोत. त्यांनी तो आणखी नावारूपाला आणावा.
प्रस्ताविकात उदयसिंह पाटील म्हणाले, काकांनी विविध सहकारी संस्थांची निर्मिती केली. काकांच्या मार्गदर्शनाखाली आणि आशीर्वादातून सर्व संस्था आपण आज ताकतीने चालवत आहोत.
कोयना बँकेचे चेअरमन रोहित पाटील यांनी आभार मानले. या कार्यक्रमास काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश पाटील, बँकेचे उपाध्यक्ष विजय मुठेकर, अजितराव पाटील-चिखलीकर, तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.