ताज्या बातम्यासातारा जिल्हाहोम

लोकनेते विलासकाका… कार्यकर्त्यांचा “विठ्ठल”

स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या मुशीत घडलेले, यशवंत विचारांची पाठराखण करणारे स्व. लोकनेते विलासकाका पाटील-उंडाळकर यांच्या 86 व्या जयंतीचे औचित्य साधून त्यांनी स्थापन केलेल्या कोयना सहकारी बॅंकेच्या प्रांगणात त्यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचा अनावरण समारंभ व बॅंकेच्या प्रशासकीय कार्यालयाचा उद्घाटन समारंभ आज राज्यातील विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या स्मृतींना दिलेला उजाळा…

विलासकाका हे खऱ्या अर्थाने कॉंग्रेस विचारांशी इमान राखणारे, जीवनाच्या अखेरपर्यंत त्या विचारांवरील आपली निष्ठा अढळ ठेवणारे लोकांमधील नेते होते. कराड दक्षिणसाठी आणि सातारा जिल्ह्यातील विलासकाका ही केवळ कथा नव्हे; तर दंतकथा बनून राहील. विलासकाकांचे राजकारण, समाजकारण, त्यांची ग्रामीण जनजीवनाशी असलेली नाळ, सर्वसामान्य कार्यकर्त्याला दिलेली सत्तेची संधी, पन्नास वर्षे राजकारणासह सहकारात केलेली लक्षवेधी कामगिरी असे अनेक पैलू त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा भाग होते. आज काका जनमाणसात नसले, तरीही त्यांचे विचार आजही जिवंत असल्याचे पहावयास मिळत आहे. ‘काका’ नावाचे अजब रसायन आहे. म्हटले तर तो कार्यकर्त्यांचा खऱ्या अर्थाने विठ्ठल होता. वारकऱ्यांशिवाय विठ्ठल नाही आणि लोकांशिवाय काका नाहीत, हे दक्षिणेतील जनतेने अनुभवले आहे. एक नव्हे, दोन नव्हे, तर तब्बल सातवेळा विलासकाका कराड दक्षिणमधून विजयी झाले. दक्षिण कराड हा आजवर कॉंग्रेसचा हुकमी अन हक्काचा गड म्हणून राज्याला परिचित आहे. या गडाची भक्कम बांधणी काकांनी आपल्या अफलातून लोकसंपर्काने सामान्य कार्यकर्त्यांच्या माध्यमातून केली.

सामाजिक, राजकीय क्षेत्रात 1967 पासून अविरतपणे कार्यरत असलेले नेतृत्व म्हणजे लोकनेते विलासकाका होय. 1980 झाली काकांनी कराड दक्षिण मतदारसंघातून पहिली विधानसभा लढवली. त्याचवेळी सातारा जिल्हा बॅंकेत काका संचालक म्हणून निवडून गेले अन् त्यांनी जिल्हा मध्यवर्तीला प्रगतीच्या शिखरावर नेवून ठेवले. आयुष्यात किती व कोणकोणत्या क्षेत्रात काम करायचे, याला मर्यादा आहेत. मात्र, विलासकाकांनी सहकार, राजकारण, समाजकारण, सांस्कृतिक, शैक्षणिक, साहित्यिक अशा विविध क्षेत्रांत आपला संचार ठेवला. एका आयुष्यात होणार नाही, इतके काम त्यांनी करून ठेवलेय. अर्थात यामागचे बाळकडू स्वर्गीय यशवंतराव चव्हाण, स्वर्गीय किसन वीर (आबा) यांच्याकडून त्यांना मिळाले. हा वारसा त्यांनी जीवनाच्या अखेरपर्यंत जोपासला. काँग्रेस पक्षाची विचारधारा त्यांच्या नसा-नसात भिनलेली होती. मध्यंतरी ते पक्षापासून दूर होते. मात्र, विचार कॉंग्रेसचेच होते. राजकीय स्थित्यंतरात त्यांना अन्य पक्षांच्या ऑफर्स होत्या. सत्तेची संधी असताना त्यांनी हा विचार मनातही आणला नाही. कॉंग्रेस पक्षाची अवस्था बिकट होत असताना कॉंग्रेसला आता प्रबोधन शिबिरांची गरज आहे, हे काकांनी आपल्या आयुष्यातील अखेरच्या सभेतही ठासून सांगितले. प्रबोधनाची गरज ते फक्त सांगून थांबले नाहीत. ही प्रबोधन शिबिरे उंडाळेत, कराडात सतत होत होती. कार्यकर्त्यांचे प्रबोधन झाले पाहिजे, ही त्यांची आग्रही भूमिका होती.

विलासकाकांनी 1980 पासून दक्षिणेतील डोंगरी व दुर्गम भागात दक्षिण मांड नदी खोरे पॅटर्न राबवले. गाव तेथे पाणी यामाध्यमातून अनेक तलाव, धरणे बांधली. भारतातील पहिला वारणा आणि कृष्णेचा नदीजोड प्रकल्प प्रत्यक्षात साकारला. दक्षिणेत सुमारे 35 वर्षांत शासकीय यंत्रणा, लोकसहभाग, जिल्हा परिषद, पंचायत समिती यांच्या सहभागातून त्यांनी अडीच टीएमसी पाणी अडवण्याची किमया त्यांनी करून दाखवली.

तसेच कृषी प्रदर्शनात एका पाहुण्यांनी, एवढे पाणी अडविण्यासाठी किमान 1 हजार कोटी रूपये शासनाच्या तिजोरीतून द्यावे लागतील, हे काम काकांनी लोकसहभाग आणि शासनाच्या माध्यमातून करून दाखवले असल्याचे सांगितले. विकास म्हणजे केवळ रस्ते, समाजमंदिरे, शाळा हा नाही. काकांनी 35 वर्षांत दक्षिणच्या डोंगरी भागातून मुंबईला रोजगारासाठी होणारे स्थलांतर थांबवले. कुसळाचा भाग म्हणून हिनवणाऱ्यांना या भागातून मुसळा एवढा ऊस पिकवला जाऊ लागल्याने टिकाकारांना त्यांनी चांगलीच चपराक दिली. ही किमया फक्त अन् फक्त विलासकाकांनी केली. डोंगरी भागात सिंचनाचा प्रश्न मार्गी लावत शेतकऱ्याला आर्थिकदृष्टय़ा समृद्ध केले. डोंगरी भागात साखर कारखान्याची अशक्यप्राय गोष्ट शक्य करून दाखवली. दक्षिणच्या भूमित विविध शिबिरे, कार्यक्रम आयोजित करत माणसांमध्ये पुरोगामी विचारांची पेरणी केली. काकांसारखा नेता पुन्हा होणे नाही. काकांच्या नेतृत्वामुळेच डोंगरी भाग विकासाच्या प्रवाहात आला. डोंगरी भागात एका – एका छोटय़ा गावात काकांमुळे कोटयवधी रूपयांची विकासकामे आली, अशी दृष्टी असणारे नेतृत्व पुन्हा लाभणार नाही.

स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी कृषी-औद्योगिक महाराष्ट्राचे स्वप्न साकार करण्यासाठी सहकार चळवळीला प्रोत्साहन दिले. महाराष्ट्रातील तरूण कार्यकर्त्यांना सहकारात काम करण्यासाठी प्रवृत्त केले. या तरूण कार्यकर्त्यांत काकांचे नाव अग्रणी होते. सातारा जिल्हा बॅंकेत काका सुमारे 50 वर्षांपेक्षा जास्तकाळ संचालक होते. काकांच्या करड्या शिस्तीने ही बॅंक प्रगतीपथावर आली. नाबार्डने अनेक पारितोषिके देऊन या बॅंकेला गौरवले आहे. त्यांनी सहकार मंत्री म्हणूनही काम पाहिले. दक्षिणेत कराड खरेदी-विकी संघ, कोयना दूध संघ, कोयना बॅंक, रयत साखर कारखाना, कै. स्वा सै. शामराव पाटील नागरी पतसंस्था, शेती उत्पन्न बाजार समिती अशा विविध संस्थांना त्यांनी नेतृत्व दिले. आपल्या सहकारातील अभ्यासाच्या जोरावर त्यांनी या संस्थांची प्रगती साधली. काकांच्या निधनामुळे त्यावेळी सर्वसामान्य कार्यकर्ता पोरका झाल्याची सार्वत्रिक प्रतिक्रिया उमटली, ती तंतोतंत होती. कार्यकर्त्यांवर पुत्रवत प्रेम करणारा नेता म्हणून काकांची खरी ओळख होती. नेता आणि कार्यकर्त्यांत एक ओढ असावी लागते, ती काका आणि त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये दिसायची. काका माणसांमध्ये नसले तर अस्वस्थ असायचे. गेली 50 वर्षे लोकांमध्ये मिसळून काम करणारे काका करोना महामारीत जखडल्यासारखे होते. फोनवरून कार्यकर्त्यांना संपर्क करायचे. कॉंग्रेसपासून दुरावलेल्या अवस्थेत पाच वर्षे काढल्यानंतर काका आठ महिन्यांनी कराडला आले आणि कॉंग्रेस पक्षाच्या व्यासपीठावर भरभरून बोलले. काकांचे ते 28 मिनिटांचे भाषण कार्यकर्त्यांनी कानात प्राण आणून ऐकले. काकांचे दर्शन झाले, भाषणही ऐकले. त्या भाषणातून मिळालेली ऊर्जा कार्यकार्यांसाठी शेवटची ठरली. मात्र, नेते अनेक होतील, पण काकांसारखा सर्वसामान्यांचा लोकनेता म्हणून पुन्हा नेता होणार नाही….!

 

Related Articles